शेतकर्यांचे पंतप्रधान मोदींना गुजराती भाषेत पत्र;
अहिल्यानगर | नगर सह्याद्री :
सध्या राज्यासह देशभरात कांदा प्रश्न चांगलाच गाजत असून, कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातील शेतकर्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजराती भाषेत पत्र लिहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठीत अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप करत शेतकर्यांनी आता पंतप्रधानांच्या मातृभाषेतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रामध्ये कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जर कांद्याला योग्य भाव देता येत नसेल, तर आमच्या शेती तुमच्या नावावर करून घ्या, अशा तीव्र शब्दांत शेतकर्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. वाढते उत्पादन खर्च, बाजारातील घसरलेले दर आणि सततचे आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे या पत्रातून दिसून येत आहे.
कांदा उत्पादकांना तात्काळ दिलासा मिळाला नाही, तर येणार्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा युवा किसान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इंजिनिअर राहुल बहिरट यांनी निवेदनात दिला आहे. यावेळी युवा किसान सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, नगर तालुक्यातील शेतकर्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या जिल्ह्यासह राज्यभर सुरू झाली आहे.










