अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यसभेची निवडणूकही जाहीर झाली आहे. त्यातच, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले असल्याने राजकीय पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात येत आहे. राज्यसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यासाठी, राहुरी मतदारसंघातून उमेदवार कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्याच महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने बारामतीमध्येही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होणार असून उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित मानलं जात आहे. कारण, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलं आहे. तर, राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता लवकरच येथेही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली. त्यामुळे, येथील उमेदवार कोण, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, तशा भावना त्यांनी माझ्याजवळ मांडल्या असून त्या मी वरिष्ठांना कळवल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक एकाच वेळी लागणार असून दोन्ही ठिकाणी नेत्यांच्या अकाली निधनाने जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने तोडगा काढून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भावना सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, 17 ऑक्टोबर 2025 रोजी शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले होते. त्यानंतर, 6 महिन्यात पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, लवकरच येथील निवडणुकांच्या घोषणा होतील.
पक्षातीत कार्यकर्त्यांना समाधानी ठेवण्यावर भर
अहिल्यानगर येथील माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर पहिल्यांदाच नगर शहरात आलेल्या सुजय विखे यांनी पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे म्हटलं आहे. भाजप हा सर्वदूर विस्तारलेला पक्ष आहे, यात नव्याने वाढ करण्याची फारशी आवश्यकता नाही. पक्ष वाढीपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना समाधानी ठेवणं आणि न्याय देणं यावर भर देणार असल्याचं देखील विखे यांनी म्हटलं आहे.










