जून अर्धा संपला तरी प्रतीक्षा कायम; चारा आणि पाणी टंचाईचे सावट
पारनेर | नगर सह्याद्री
जून महिना अर्ध्यावर आला तरीही पावसाने अजूनही अपेक्षित हजेरी न लावल्याने पारनेर तालुक्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या असून, शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बियाणे, खते खरेदी करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला होता. मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील जमिनी तशाच आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या थांबवाव्या लागल्या आहेत. पारनेर परिसरातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे.
वेळेवर पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामाच्या उत्पादनावर याचा थेट परिणाम होतो. पावसाअभावी पेरणी उशिरा झाली, तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होण्याची भीती असते. ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थकारण हे शेतीवर आधारित असल्याने पावसाच्या या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. वासुंदे येथील शेतकरी संतोष हिंगडे म्हणाले की, आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता पाऊस लांबल्यामुळे पेरणीचा खर्च तर वाढणारच आहे, शिवाय पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवेल की काय, याची भीती वाटत आहे.बळीराजा सध्या अस्मानी संकटापुढे हतबल झाला आहे. वरुणराजाने लवकरात लवकर हजेरी लावावी, अशी प्रार्थना प्रत्येक शेतकरी करत आहे. पावसाचे आगमन लांबल्यास तालुक्यात चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता संपूर्ण पारनेर तालुक्याचे लक्ष आभाळातील ढगांकडे लागले आहे.










