सरकारने हिंदू -मुस्लिम वाद निर्माण केला : खासदार लंके
पारनेर/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही तर राज्यभर जनआक्रोशाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. सरसकट कर्जमाफी, कांदा-दूध उत्पादकांना न्याय, अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित मदत, लोडशेडिंग बंद आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या सरकारने हिंदू-मुस्लिम किंवा जातीय वाद निर्माण करून जनतेचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांत अतिवृष्टीची मदत वितरित करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मंत्रालयात घुसूनही आंदोलन करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे स्पष्ट मत खासदार नीलेश लंके यांनी पारनेर तहसील येथे सर्वपक्षीय आंदोलनात बोलताना व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पारनेर तहसील येथे येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. ट्रॅक्टर, बैलगाड्या, मेंढ्या, जनावरांसह शेतकरी तहसीलमध्ये घुसले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आंदोलनात खासदार निलेश लंके यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अर्जुन भालेकर, रा. या. औटी, शिवसेना नेते भास्कर शिरोळे, ज्येेष्ठ नेते मारुती रेपाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, ॲड राहुल झावरे, मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार, माजी सरपंच सतीश पिंपकर, माजी सरपंच ठकाराम लंके, युवा सेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, दीपक लंके, प्रवक्ते मोहनराव रोकडे, दिपक नाईक, विद्याथ नेते जितेश सरडे, सरपंच प्रकाश गाजरे, किरण ठुबे, गुंडा भोसले, रवींद्र राजदेव, डॉ. बाळासाहेब कावरे, बापू शिर्के, नितीन अडसूळ अभयसिंह नांगरे, बाळासाहेब पुंडे, अमोल यादव, योगेश मते बाळासाहेब खिलारी चंद्रभान ठुबे, अमोल उगले, गणेश तांबे, अमित जाधव, महेंद्र पांढरकर, योगेश मते, बाजीराव कारखिले, अमोल ठुबे, संदीप मते, दत्तात्रय साळुंके, जालिंदर लंके, संतोष थोरात, बाळासाहेब दिघे, डॉ. सादिक राजे, सुभाष शिंदे, पोपट गुंड, लखन ठाणगे, रवींद्र गायखे, महादेव म्हस्के, भाऊ चौरे, विशाल गागरे, आदी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेनेचे पदाधिकारी व तालुक्यातून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अटी व शत न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची प्रमुख मागणी केली. तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव मिळावा, पेट्रोल, डिझेल, खते, बियाणे आणि औषधांच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पीक विमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून केवळ एक रुपयात प्रभावी पीक विमा योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी खासदार लंके यांच्यावतीने आंदोलकांनी दिला. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसील प्रशासनाला निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी निवेदन दिले.
चौकट :
आंदोलनात पावसाची हजेरी
पारनेर येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच जनावरे आणण्यात आली होती. आंदोलनामध्ये शेतकरी तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलन सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली.
चौकट :
एजंट लोकांना बंदी करा
पारनेर येथील प्रशासकीय कार्यालयांमध्ये अनेक एजंट तयार झाले आहेत. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खिसा कापण्याचे काम करत आहे. अशा एजंट लोकांवर कारवाई होण्याची गरज आहे. या एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेटलमेंट चालते. यामुळे शेतकरी वर्गाचीच व ग्रामस्थांची खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. या एजंट लोकांना तहसील व पोलीस स्टेशन परिसरामध्ये फिरण्यास बंदी करा
गंगाराम बेलकर, सभापती, पारनेर










