कोल्हार खुर्दमधून पुन्हा पाच विद्युत पंपांची चोरी : तपास न लागल्यास आंदोलन
कोल्हार | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. गेल्या चार दिवसांपूव चोरी झालेल्या विद्युत मोटारींची घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याच ठिकाणावरून 5 विद्युत पंपाची चोरी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विजेचा लपंडाव आणि विद्युत मोटरींची चोरी अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर या चोऱ्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपंप चोरीचे सत्र सुरू झाले असून हे सत्र थांबायचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपूव प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या विहिरींमधून एकाच रात्रीत 5 विद्युत पंपाची चोरी झाली होती. शेतकऱ्यांनी थेट राहुरी पोलीस ठाण्याचे दार ठोठावले. चोरीचा तपास लावण्याचा आग्रह धरत तक्रार दाखल केली. राहुरी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपूव कोल्हार खुर्दमध्ये येऊन चोरीचा पंचनामा केला.
पंचनामा करून काही तास देखील उलटलेले नसताना दि. 14 च्या मध्यरात्री पुन्हा एकदा याच ठिकाणावरून दत्तात्रय कातोरे, अण्णासाहेब कातोरे, अण्णासाहेब काळे, अण्णासाहेब गागरे, प्रमोद काळे अशा 5 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी अण्णासाहेब काळे यांनी एक दिवस नवीन सोडलेला विद्युत पंप सुरु देखील केला नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून आज पुन्हा राहुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात गेले आहे. झालेल्या सर्व चोऱ्यांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दोन महिन्यांत एकाच शेतकऱ्याचे सहा पंप चोरीस
दत्तात्रय कातोरे या शेतकऱ्याच्या गेल्या दोन महिन्यांत तब्ब्ल 6 विद्युत पंपाची चोरी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतातील उभे पीक देखील सुकून चालले असल्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे उद्विग्न विचार या शेतकऱ्याने मांडला आहे.
तलाठ्यावर शेतकऱ्यांचा रोष
विद्युतपंपाची चोरी झालेल्या ठिकाणी तलाठ्यांच्या आशिर्वादामुळे अवैध वाळू वाहतुकीसाठी प्रोत्साहन प्राप्त होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्यामुळेच विद्युत पंप चोरीला गेले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून सर्व चोऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी, त्याचप्रमाणे त्यांची तत्काळ या गावातून बदली करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.










