ठरावाचे राजकारण पेटले , पारनेर तालुक्यात खळबळ
पारनेर/नगर सह्याद्री :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रियेची तयारी सुरू असताना पारनेर तालुक्यातील तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील दोन संचालकांच्या अपहरणापाठोपाठ लोणी हवेली येथे असाच प्रकार घडला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष चांगदेव दुधाडे यांनी त्यांच्या भावाला मतदानापासून रोखण्यासाठी पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सुभाष दुधाडे (वय ५५) हे लोणी हवेली येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात. ते भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस आहेत. गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ठरावासाठी १३ जुलै रोजी निवडणूक होणार असून, त्यामध्ये संचालक मंडळ मतदान करणार आहे. या मतदानात त्यांचे भाऊ शिवाजी चांगदेव दुधाडे हे मतदार आहेत.
दुधाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून त्यांचे भाऊ शिवाजी दुधाडे हे बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, रात्री सुमारे ९.५१ वाजता गावातील अमोल विक्रम दुधाडे, जो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा कार्यकर्ता आणि विद्यमान उपसरपंच असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे, त्याने संभाजी दुधाडे यांना फोन करून शिवाजी आप्पांना कोणत्या गोळ्या चालू आहेत, ते सांगा. ते माझ्यासोबत आहेत, असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर सुभाष दुधाडे, संभाजी दुधाडे आणि इतर नातेवाईकांनी शिवाजी दुधाडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तसेच अमोल दुधाडे यांचाही मोबाईल बंद आढळून आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. शिवाजी दुधाडे हे घरी परतले नसून, सोसायटीच्या ठराव बैठकीत त्यांनी त्यांच्या पसंतीच्या गटाला मतदान करू नये, या उद्देशाने अमोल विक्रम दुधाडे यांनी त्यांना पळवून नेऊन कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.या प्रकरणामुळे लोणी हवेलीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.










