श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यात आर्द्रा नक्षत्राच्या सरी बरसल्या असले तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहिणी आणि मृग नक्षत्र जवळपास कोरडे गेल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्द्रा नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तालुक्यात अनेक ठिकाणी केवळ तुरळक सरी कोसळल्याने जिथे ढग तिथे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान तज्ज्ञांनी आर्द्रा नक्षत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली असली तरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचेही बाष्पीभवन झाले. परिणामी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेऊन मोठा आर्थिक भार सहन केला आहे.
दरम्यान, कुकडी प्रकल्पाच्या पाण्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. उन्हाळी आवर्तनाबाबत अपेक्षा असतानाच पाणीपुरवठा मर्यादित राहिल्याने अनेक भागांतील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक गाव तलाव कोरडे पडल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना पावसाचा लांबलेला मुक्काम, पाण्याची कमतरता आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.










