स्पोर्ट डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या श्रीलंका दौऱ्यावर ‘भारत अ’ संघासोबत असून, तिथे यजमान श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराजने आज अफगाणिस्तानविरुद्ध ६६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली. या ६६ धावांच्या खेळीदरम्यान ऋतुराजने आधुनिक क्रिकेटचा सम्राट विराट कोहलीचा एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
विराट कोहलीला टाकले मागे; जगात अव्वल –
ऋतुराज गायकवाडने ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये किमान ५००० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जगातील सर्वोत्तम सरासरीचा नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋतुराजच्या नावावर आता ५,२२७ धावा असून, त्याची सरासरी ५९.३९ इतकी झाली आहे. यासह त्याने विराट कोहलीला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. विराटच्या नावावर १६,४४७ धावा असून त्याची सरासरी ५७.९१ इतकी आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेवन (५७.८६) तिसऱ्या, तर चेतेश्वर पुजारा (५७.०१) चौथ्या स्थानावर आहे.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरी (किमान ५००० धावा)
५९.३९ – ऋतुराज गायकवाड (५२२७ धावा)*
५७.९१ – विराट कोहली (१६४४७ धावा)
५७.८६ – मायकल बेवन (१५१०३ धावा)
५७.०१ – सी. पुजारा (५७५९ धावा)
५३.५२ – खुर्रम मंजूर (७९२२ धावा)
वैभव सूर्यवंशी अन् प्रभसिमरनची वादळी सुरुवात –
या सामन्यात अफगाणिस्तान ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताच्या सलामीवीरांनी त्यांचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. १५ वर्षांच्या युवा वैभव सूर्यवंशीने अवघ्या २१ चेंडूंत ४४ धावांची आणि प्रभसिमरन सिंगने ६९ चेंडूंत ८४ धावांची तुफानी खेळी करत भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (६६) आणि कर्णधार तिलक वर्मा (६६) यांच्या अर्धशतकानंतर सूर्यांश शेडगेच्या वादळी ४० धावांच्या भारताने ४९ षटकांत ९ बाद ३४९ धावांचा डोंदर उभारला आहे.










