श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यात भविष्यात गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शेती, पाणी, शेजार, जागा आदी कारणांमुळे उद्भवणारे वाद कमी व्हावेत, या उद्देशाने श्रीगोंदा पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत बीएनएसएस अंतर्गत 177 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
1 जानेवारी ते 12 जून या कालावधीत शेती, पाणी, शेजारील वाद, जागेचे वाद तसेच इतर कारणांमुळे दाखल झालेल्या दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतला होता. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या पर्यवेक्षणाखाली ही मोहीम राबविण्यात आली.मागील सहा महिन्यांत तहसीलदार कार्यालयात बीएनएसएस कलम 126 अंतर्गत दाखल झालेल्या 296 प्रतिबंधात्मक प्रस्तावांवरील नोटिसा बजावण्याचे काम प्रलंबित होते.
तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या समन्वयाने बीएनएसएस कलम 130 अंतर्गत सर्व 296 नोटिसा तयार करण्यात आल्या. त्यापैकी आजपर्यंत श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदारांनी 266 नोटिसा यशस्वीपणे बजावल्या.नोटीस बजावल्यानंतर संबंधितांना 1 लाख रुपयांचा जातमुचलका आणि एका जामीनदारासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 177 प्रतिवादी जामीनदारांसह उपस्थित राहून बीएनएसएस कलम 136 अंतर्गत अंतिम जातमुचलका (बॉन्ड) सादर केला.उर्वरित 89 व्यक्तींवरील प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण करण्यासाठी ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, मनोहर खिळदकर, संजय वाघमारे, पवन मोहिते तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सर्व बीट अंमलदारांनी सहभाग घेतला.










