सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात बुधवारी दुपारी चार वाजता वादळी वार्याने जोरदार तडाखा दिला. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळामुळे शेतातील कांदा झाकण्यासाठी शेतकर्यांची एकच धावपळ उडाली.
गेली तीन ते चार दिवसांपासून आकाशात ढग भरून येतात. त्याप्रमाणे बुधवार दि. २२ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान सुसाट वारा सुटल्याने रूईछत्रपती येथील विलास माधवराव पाटील यांच्या गट नंबर ६७ मध्ये उभारलेले सौर ऊर्जा पॅनल उडाल्याने मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळामुळे काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. अनेक झाडे उन्मळून पडली. तर शेतातच झाकलेल्या कांद्यावरील कागद उडाल्याने शेतकर्यांची एकच धांदल उडाली.
सुपा जिरायती पट्ट्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या गावरान कांदा काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कांदा काढल्यावर तो चार ते पाच दिवस शेतातच ठेवला जातो, तेथेच काटणी केली जाते. चालू वर्षी मात्र एप्रिल महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एक तर कांद्याला पाच ते दहा रुपये बाजारभाव मिळत आहे. वरून निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.










