पारनेर / नगर सह्याद्री –
भाळवणी आणि परिसरातील वाडी-वस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ३०) जोरदार धडक मोर्चा काढला. सकाळी नऊ वाजता भाळवणी येथील बाजारतळावरून या मोर्चाला सुरुवात झाली. आक्रमक झालेल्या नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र कार्यालयावर धडक देत प्रशासनाचा निषेध केला आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
विशेषतः सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने अंधार पडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच वीज नसल्याने महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या वीज संकटामुळे केवळ सुरक्षिततेचा प्रश्नच निर्माण झाला नसून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. व्यावसायिक आणि दूध उत्पादकांनाही कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटल्याचे आज पाहायला मिळाले.
मोर्चानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक अभियंता विलास पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी बाबासाहेब तरटे, विकास रोहकले, संदीप रोहकले, संदीप ठुबे, संभाजी आमले, प्रमोद गोडसे, बी. वाय. रोहोकले, विठ्ठल रोहोकले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अभियंता विलास पाटील यांनी या समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जर भारनियमन तात्काळ थांबवले नाही, तर यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.
ठिय्या आंदोलन; तीव्र आंदोलनाचा इशारा
मोर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी वीज उपकेंद्र कार्यालयासमोर सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले.यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी केली. सायंकाळच्या वेळेतील भारनियमन त्वरित रद्द न केल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.










