मुंबई | नगर सह्याद्री –
मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री या कुटुंबाने बिर्याणी खाण्याचा बेत आखला होता होता. या चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगडही खाल्ले. काही तासांनंतर, पहाटे 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास चौघांची प्रकृती बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. इतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. पण, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसल्याने त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्दैवाने, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमागे विषबाधेचे कारण असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमके कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन करण्यात आले आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच, डॉक्टरांनी आपले अंतिम मत राखून ठेवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घरातून खाद्यपदार्थ आणि कलिंगडाचे नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत. कलिंगड हे मृत्यूचे कारण होते की रात्रीच्या जेवणात काहीतरी गडबड होती, याचा तपास पोलीस आता करत आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.










