पारनेर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत प्रभावी प्रयत्न केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ३०० गावांमधील तब्बल २७ हजार ६०२ शेतकरी बाधित झाले असून १४ हजार ३४९.३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी सुमारे २५ कोटी २० लाख रुपयांच्या जो मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता त्यास मंजुरी मिळाली आहे.
पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील एकूण २८ गावांतील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी प्रशासन व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून प्रस्ताव गतीने पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून आमदार काशिनाथ दाते यांची भूमिका यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पारनेर तालुक्यात २३ गावांतील ४ हजार ८६९ शेतकरी बाधित झाले असून ३ हजार ३६९.०७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले होते. त्यासाठी सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. तसेच अहिल्यानगर तालुक्यातील ५ गावांतील ६४३ शेतकऱ्यांचे ४९८.५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते त्यासाठी ८५ लाख रुपयांहून अधिक मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता दोन्ही प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून मतदारसंघातील बाधित शेतकऱ्यांना संबंधित अनुदान लाभ मिळणार आहे.
आ. काशिनाथ दाते










