तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी
पारनेर / प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिमझिम पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून चिकणेवाडी,सावरगाव येथील शेतकरी पुंडलिक गोविंद चिकणे यांच्या राहत्या घराच्या पुढील व मागील बाजूच्या दगडी भिंती कोसळल्या आहेत. तसेच उर्वरित भिंतींना मोठमोठे तडे गेल्याने संपूर्ण घर धोकादायक अवस्थेत पोहोचले आहे.
घटनेच्या वेळी घरातील सदस्य बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबासमोर सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने उर्वरित घरही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा करावा व शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई त्वरित मंजूर करावी, बाधित कुटुबांला दिलासा द्यावा, अशी मागणी युवा नेते निलेश चिकणे यांनी केली आहे. तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रशासनाने त्यांना तातडीने घरकुल मंजुर करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करावी
सावरगाव (चिकणेवाडी) येथील शेतकरी श्री. पुंडलिक गोविंद चिकणे यांच्या घराचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाच्या नियमांनुसार नुकसानभरपाई मंजूर करावी. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना त्वरित मदत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून प्रशासनाने या प्रकरणात कोणताही विलंब होऊ नये.
गंगाराम चिकणे, उपसरपंच










