श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरणार्या घोड धरणामधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक मार्चपासून सुरू झालेल्या या आवर्तनाचा कालावधी २६ दिवसांचा असणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
या आवर्तनामुळे खोडवा ऊस, गहू, उन्हाळी कांदा तसेच फळबागांना मोठा फायदा होणार आहे. दोन मार्च रोजी दुपारी ३७५ युसेकने कालव्यात विसर्ग वाढवण्यात आला असून, तीन मार्च रोजी साडेचारशे युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती मढेवडगावचे उपविभागीय अधिकारी टणके यांनी दिली.
उन्हाळी हंगामात वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील उपलब्ध साठ्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने सुमारे एक टीएमसी पाण्याच्या आवर्तनाची गरज भासते. त्यानुसार नियोजनपूर्वक हे आवर्तन सोडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्यांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चालूवर्षी उन्हाची तीव्रता लवकर वाढू लागल्याने उभी पिके वाचविण्यासाठी हे पहिले उन्हाळी आवर्तन महत्त्वाचे ठरत आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी अपव्यय आढळेल, तेथे तात्काळ घोड सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच मागील थकीत पाणीपट्टी वेळेत भरून पुढील आवर्तनास विलंब होणार नाही, यासाठी शेतकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी टणके यांनी केले.












