अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज काल खरा ठरला आहे. कारण सांगलीसह काही जिल्ह्यांमध्ये रविवारी (19 एप्रिल) पाऊस पडला. हवामान विभागाकडून 23 एप्रिलपर्यंत पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही 20, 21 आणि 22 एप्रिलला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कदाचित वादळी पावसाची शक्यता आहे. पण रायगड, धुळे, नंदुरबार, लातूर, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, पुणे, सोलापूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर, सातारा, सांगली या 20 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वार्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, वादळी पाऊस होत असल्याने काढणीस आलेला गहु, हरभरा काढून घेऊन तो सुरक्षितस्थळी ठेवावा, तसेच अन्य पिकांचेही नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 एप्रिलसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ अशा 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या 22 एप्रिलला जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धारशिव, सोलापूर, पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये 23 एप्रिलला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.










