तहसीलदारांना दिले निवेदन
जामखेड | नगर सह्याद्री
पुण्यलोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी गावामुळे ऐतिहासिक ओळख लाभलेल्या जामखेड शहराच्या नामांतराची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. जामखेड शहराचे नामकरण ‘अहिल्याधाम’, अहिल्यातीर्थ’ किंवा अहिल्याग्राम’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी जन जागरण युवा मंचचे संस्थापक डॉ. भास्करराव पाटील मोरे यांनी तहसीलदार धनंजय बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला लोककल्याण, न्यायप्रियता, धर्मकार्य आणि समाजसेवेची प्रेरणा मिळाली आहे. चौंडी हे त्यांचे जन्मस्थान जामखेड तालुक्यात असल्याने या परिसराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जामखेड शहराला अहिल्यादेवींचे नाव दिल्यास शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जामखेड शहराला सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा मोठा वारसा लाभलेला असून, चौंडी येथे दरवष हजारो भाविक भेट देतात. अशा परिस्थितीत शहराचे नामकरण अहिल्यादेवींच्या नावाने झाल्यास धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.भावी पिढीसमोर लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श कायम राहावा आणि त्यांच्या स्मृती चिरंतन जतन व्हाव्यात, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी ॲड. हर्षल डोके, सागर मोरे, हर्षद वाळुंजकर, आर. डी. काळे, सुमित बोरा, कल्पेश गायकवाड, साहिल मुजावर, साहिम सय्यद, शहा मुक्तार, फरहान शेख, महेश मोरे, शौकत पठाण, मोहिद्दीन शेख, ढवळे, आयुब पठाण, आशिर पठाण, फैय्याज पठाण आदी उपस्थित होते










