हेवेदावे सोडा, सकारात्मक दृष्टिकोनाने निवडणुकीला सामोरे जा;पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत अक्षय कर्डिले भरणार सोमवारी उमेदवारी अर्ज
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्व.शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी स्व.कर्डिले यांची धडपड होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे एकमेकांबद्दल गावात हेवेदावे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मतदारापर्यत पोहचविण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुयातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आ.मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उमेदवार अक्षय कर्डीले, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, माजी सभत्तपती काशिनाथ लवांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साकळाई योजनेच्या कामाला १२३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
मंत्री विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण आहे. कोव्हीड संकटानंतर अशा वातावरणात सुद्धा देश यशस्वीपणे वाटचाल करतो, हे प्रधानमंत्र्यांच्या धोरणाचे यश आहे. परंतु, इंधन आणि गॅसच्या टंचाईवरून सरकारला बदनाम करण्याच्या होणार्या प्रयत्नांना कार्यकर्त्यानी उतर देण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. वांबोरी चारी, साकळाई योजनेचे स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने झालेले निर्णय महत्वाचे आहेत. वर्षानुवर्षे दुष्काळ पाहिलेल्या भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. भविष्यात राहुरी तालुयातील औद्योगिक विकासासाठी काम करून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने होणार्या निवडणुकीला सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील केले. आ.मोनिका राजळे यांनी स्व.कर्डिले यांच्या कार्याला उजाळा देऊन प्रत्येकाने स्वतः अक्षय कर्डिले समजून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. तालुयातील दुष्काळी भागातील शेतकर्यांसाठी साकळाई योजनेचा झालेला निर्णय निवडणुकीसाठी शुभसंकेत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले यांची भाषण झाली.
खरातची पाळेमुळे शिर्डीत की संगमनेरात लवकर समजेल
काँग्रेस पक्षाने राहुरी विधनासभा निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयावर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुतीचा विजय निश्चित आहे. थोरातांनी राहुरीपेक्षा संगमनेरची निवडणूक गांभिर्याने घ्यायला हवी होती. अशोक खरात यांच्या प्रकरणाबाबत थोरातांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना या प्रकरणाचे पाळेमुळे शिर्डीत की संगमनेरमध्ये हे चौकशी समितीतून समजेल, असे सूचक वक्तव्य मंत्री विखे यांनी केले.










