श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा-मांडवगण रोडचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून तब्बल 215 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची अंमलबजावणी कृष्णाई इन्फ्रा कंपनीकडून केली जात आहे. मात्र, सोमवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या पहिल्याच पावसात या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यांवर पाण्याची तळी निर्माण झाली असून वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीचा केवळ देखावा करण्यात आला असून पहिल्याच पावसात कृष्णाई इन्फ्रा कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.
विशेषतः शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली नसल्यास संपूर्ण पावसाळाभर नागरिकांना याच समस्यांचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणेला योग्य सूचना द्याव्यात व कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या संदर्भात संबंधित कामाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.










