मुंबई / नगर सह्याद्री :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतेक शहरांचा पारा चाळीशी पार गेला. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे तापमान ४५ च्या पार होते. अकोला तर देशातील सर्वोच्च तापमानात आघाडीवर होतं. पण आता थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण, पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानाचा पारा घट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यासोबतच पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे राज्यात अनेकांना त्रास झाला. लातूर, विदर्भासह काही ठिकाणी उति उष्णतेमुळे मृत्यूची नोंदही झाली. अल निनोमुळे तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा राज्याचा पारा सामान्य होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील ४८ तासात राज्याचे घसरणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले आहे. विदर्भातील तापमानातही मोठी घट होणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
४ दिवस पावसाची शक्यता –
विदर्भात तापमानात घट होणार आहे. पुढील २४ ते ४८ तासात हवामात काही अंशाने कमी होईल. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात मे महिन्यात ३ ते ४ दिवस पवसाची शक्यता आहे. २, ३ आणि ४ मे या दरम्यान विदर्भासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्यास नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
राज्याचा पारा घसरणार –
अकोलासह विदर्भातील अनेक जिल्ह्याचे तापमान ४६ पर्यंत पोहचले होते. पण पुढील ४८ तासांच्या आत तापमान कमी झालेले पाहायला मिळेल. तर राज्यात अनेक ठिकाणी ४० डिग्री तापमान आहे, ते पुढील काही दिवस कायम राहू शकते. पण राज्यात कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. पुण्यासह राज्यात पुढील २ ते ३ दिवसात तापमान कमी होईल. राज्याचा पारा ३८ ते ४० च्या आसपास राहू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्याचा पारा ५५ वर जाणार?
दरम्यान, राज्याचा पारा ५५ वर जाणार असल्याचा एक मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पुणे वेधशाळेने सांगितलं आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही. असा कुठलाही मेसेज हवामान विभागाने दिला नाही. त्यामुळे कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.










