मुंबई : नाशिकमध्ये ‘कॅप्टन’ म्हणून ओळखला जाणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्या घृणास्पद कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्योतिषाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी कठोर शिक्षेची मागणी केली असताना, अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ममता कुलकर्णी यांनी या प्रकरणात पीडित महिलांवरच काही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “महिला अशोक खरातकडे गेल्या तेव्हा त्यांनी विचार का केला नाही? एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलावण्यावर बेडरूममध्ये जाणं योग्य आहे का? यात काही प्रमाणात त्यांचाही विचार झाला पाहिजे.”

त्यांनी पुढे धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीवरही टीका केली. “आजकाल अनेक जण धर्माचा वापर करून लोकांना फसवत आहेत. अशा भोंदूगिरीपासून दूर राहून श्रद्धा थेट ईश्वरावर ठेवावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.
तथापि, त्यांनी पीडित महिलांना पूर्णपणे दोषी धरले नसल्याचेही स्पष्ट केले. “त्या महिलांना फसवण्यात आले आहे. त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. पण अशा प्रसंगी त्यांनी विरोध करायला हवा होता,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध मार्ग वापरत होता. त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, काही धक्कादायक बाबींचाही तपास सुरू आहे. न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे समाजात भोंदूबाबांबाबत जागरूकता आणि सावधगिरीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.










