व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
येथील सर्जेपुरा भागातील प्रसिद्ध ‘पेशवाई श्रीमंत’ या कापड दुकानाच्या शाखेत ग्राहकांना बनावट बिले देऊन तब्बल ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मुख्य व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील व्यावसायिक अमोल दत्तात्रय येमुल यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी २०१९ मध्ये अहिल्यानगरमध्ये ही शाखा सुरू केली होती. या शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत राजाराम बल्लाळ, विभाग व्यवस्थापक राजेंद्र कराळे, बिलिंग विभागातील आदित्य रमेश परदेशी आणि त्याचे वडील रमेश परदेशी यांनी संगनमत करून हा अपहार केला. कोरोना काळामुळे २०२१ पर्यंत मालाची मोजणी होऊ शकली नव्हती. मात्र, २०२२ आणि २०२३ मध्ये केलेल्या तपासणीत सुमारे ३ हजार ६०० नग कमी असल्याचे आढळून आले.
आरोपींनी ग्राहकांना मालाची विक्री करताना अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये नोंद न करता हाताने बनवलेली बनावट बिले दिली. या माध्यमातून जमा झालेली ४५ लाख रुपयांची रोकड आरोपींनी संगनमताने हडप केली. ऑगस्ट २०२३ मध्ये हा प्रकार समोर आल्यावर मुख्य आरोपी प्रशांत बल्लाळ याने फसवणुकीची कबुली दिली होती, मात्र पूर्ण रक्कम परत न केल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










