उद्धट, बेशिस्त, कामचुकार कर्मचाऱ्यांवर एक महिन्याच्या बिनपगारी व दंडात्मक कारवाई त्वरित करण्याचे आदेश
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर शहरात सर्वत्र असलेली अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य, अतिक्रमणे, मोकाट कुत्रे व जनावरांमुळे त्रासलेले नागरिक या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी महानगरपालिकेच्या उपायुक्तांसह, अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरिक्षक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला. मुंबईसारखी घटना नगर मध्ये होण्याची वाट पाहू नका, नागरिकांच्या आरोग्याची व जीवाशी खेळू नका, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना राबवा. उद्धट, बेशिस्त, कामचुकार कर्मचाऱ्यांवर एक महिन्याच्या बिनपगारी सुटीची व दंडात्मक कारवाई त्वरित करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मूतकेकर यांना दिले.
नगर शहरात पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांचे चावे घेतल्याची घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेवर मोर्चाने जात अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मूतकेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यानंतर आ.संग्राम जगतापही तिथे येत आक्रमक भूमिका घेत तातडीने सर्व प्रमुख अधिकरी व स्वच्छता निरिक्षकांची बैठक बोलावण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीत आ.संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे नगरसेवकांनी उपायुक्तांसह, अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरिक्षक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला. शहरातील सत्ताधारी नगरसेवकांचे कामे होत नाहीयेत, मनपाचे अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत कामचुकारपणा करत आहेत, एक काम दहा वेळा सांगूनही त्यावर कारवाई होत नसल्याची नाराजी यावेळी आ.जगताप यांच्यासह सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली.
शहरात निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे संतप्त झालेले आ.संग्राम जगताप म्हणाले, महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी व स्वच्छता निरिक्षक कर्मचाऱ्यांनी उद्यापासून रोज सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या भागात जाऊन नागरिकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते पूर्ण करावेत. त्या भागात डीप क्लीन सह रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकानांचे बोर्ड, मातीचे ढिगारे त्वरित काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा. रस्त्यावरील चेंबरचा व गटेरींचा सर्वे करून त्यावर झाकणे बसवा. झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापून तसेच रस्त्यावर आलेल्या झाडांची छाटणी करा, पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांवर कारवाई करून त्यांना पकडा. यासाठी मंजुरीची वाट न पाहता आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे त्वरित कारवाई करा. केलेल्या कामाचे फोटो काढून वरिष्ठांना व प्रभागाच्या नगरसेवकांना पाठवावीत, असे आदेश आ.संग्राम जगताप यांनी दिले.
ते म्हणाले, ज्या संस्थेचे मीठ खातो त्याप्रती निष्ठा बाळगून दिलेल्या कामाचे कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडणे आवश्यक असताना नगरमध्ये विरुद्ध परिस्थिती आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश घालूनच काम केले पाहिजे असे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिला.
यावेळी महापौर ज्योती गाडे यांनी आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे व आदेशांचे तंतोतंत पालन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करून नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी निष्ठेने काम करण्याचे आदेश दिले. या बैठकीत उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक निखिल वारे, प्रकाश भागानगरे, अनिल बोरुडे, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, अनिल ढवण, महेश लोंढे, मयूर बांगरे, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींनी वेगवेगळे विषय, समस्या मांडून परिस्थितीची माहिती दिली. महानगरपालिकेचे उपायुक्त मेहेर लहारे, शहाजान तडवी, अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर तसेच सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.










