नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातील स्वच्छता आणि नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार सूचना देऊनही पारनेर नगरपंचायत प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने, आता पारनेर बसस्थानक परिसरातील गटारीचे दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार नागरिकांकडून आवाज उठवूनही दखल घेतली गेली नाही. परिणामी बसस्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गटारी तुंबल्या आणि सांडपाणी रस्त्यावर पसरले. बसस्थानक परिसर हा शहराचा मुख्य भाग असल्याने येथे दररोज हजारो नागरिक आणि प्रवाशांची ये-जा असते. रस्त्यावरून वाहणाऱ्या या दूषित पाण्यामुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरून चालावे लागत आहे.या दुर्गंधीमुळे बसस्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच, दूषित पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या सांडपाण्यातून आरोग्याच्या समस्या अधिक उग्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपंचायतीला वारंवार सांगूनही यावर ठोस उपाययोजना केली जात नाही, ही संतापजनक बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.










