वाहनांच्या रांगा; पोलिसांवर वाहतुकीचा भार
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना दररोज तासनतास या कोंडीत अडकून पडावे लागत आहे. खर्डा चौक ते बीड रोड या मुख्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जामखेडकरांचे जगणे मुश्किल झाले आहे. महामार्गावर मोठ्या गाड्या आणि दुचाकींची प्रचंड गद झाल्याने रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाहनांच्या तुलनेत शहरात केवळ दोन वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण शहराच्या वाहतुकीचे नियमन करण्याचा प्रचंड ताण येत आहे. त्यातच, या पोलिसांना वारंवार इतरत्र व्हीआयपी ड्युटी किंवा बंदोबस्तासाठी पाठवले जाते. अशा वेळी मुख्य चौकांमध्ये कोणीही नियत्रंण ठेवणारे नसल्याने वाहतुकीचा मोठा गोंधळ उडतो. अरुंद रस्ते आणि वाहनांची बेशिस्त यामुळे बस आणि ट्रकसारखी अवजड वाहने एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत.
खर्डा चौक ते बीड रोड या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपरिषद आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. रस्त्यावर पडलेली खडी आणि मातीमुळे धूळ प्रदूषणही वाढत आहे, ज्याचा फटका वाहनधारकांसह व्यापाऱ्यांनाही बसत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही या ट्रॅफिक जॅममध्ये अडकत आहेत. तातडीच्या उपचारांची गरज असताना रुग्णवाहिकांना वाट काढण्यासाठी 20 ते 30 मिनिटे एकाच जागी उभे राहावे लागत आहे. एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.










