सीमांकन पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन करून काम सुरू करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाविरोधात अखेर ग्रामस्थांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत ग्रामस्थांनी प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढल्यानंतर महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडले.
नारायणगव्हाण गावातून जाणारा महामार्ग अपूर्ण आणि अरुंद असल्याने त्याठिकाणी सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्या रस्ता प्रस्तावाला काही लोकप्रतिनिधींचा विरोध, विविध स्तरांवरील पत्रव्यवहार आणि ग्रामसभेच्या भूमिकेतील विसंगती यामुळे चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे.
वाढती वाहतूक आणि अपघातांची मालिका लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके आणि शरद पवळे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सचिन शेळके यांनी भर उन्हाळ्यात लोटांगण आंदोलनही केले, मात्र त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस एस लाड यांनी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.महसूल विभागाच्या मंडल अधिकारी मिना गायकवाड यांनी दोन दिवसांपूव भूमिअभिलेख विभागाकडून सीमांकनाचा नकाशा प्राप्त झाल्याचे सांगत, पुढील आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र ग्रामस्थांनी काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास चिंचकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. फोनवर झालेल्या संवादात चिंचकर यांनी दोन दिवसां पूर्वी सीमांकनाचा नकाशा प्राप्त झाल्याची माहिती देत, संबंधित जमीनमालकांना मोबदला देण्यासाठी आवश्यक मूल्यांकन प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुसऱ्याच दिवशी वेग नियंत्रित करणारे स्पीड ब्रेकर बसविण्यात येतील, अशी माहितीही देण्यात आली.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन शांततेत पार पडले. सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी, जमीनमालकांना योग्य मोबदला देऊन चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला. उपसरपंच राजेश शेळके यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी आज लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केले असून, प्रशासनाने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण न केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या आंदोलनात चेअरमन बाळासाहेब चव्हाण, बबन खोले, बाळासाहेब गोरे, सुनील भंडारी, अजिंक्यतारा दरेकर, रामदास जाधव, गणेश नवले, हुसेन शेख, बाळासाहेब नवले, बालाजी कांडेकर, काशिनाथ नवले, विशाल कांडेकर, प्रकाश चव्हाण, सूरज खरात, भाऊसाहेब शेळके, गणेश भोसले, सागर कांडेकर, मोहन कांडेकर, शुभम शेळके, सोमनाथ शेळके, ग्रामपंचायत सदस्या शाहीदा शेख, लता कांडेकर, स्वाती शेळके, रुपाली शेळके, शारदा वेताळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला आणि शालेय विद्याथ सहभागी झाले.










