इम्पेरियल चौकातील वैष्णव मित्र मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इम्पेरियल चौकात फुलसौंदर मळा येथील वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक सजावट करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयुर्वेदिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह नगरसेविका सुनिता फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सुजाता पडोळे, ज्ञानदेव पांडूळे, विष्णु फुलसौंदर, अवधुत फुलसौंदर, एस.टी.बोरुडे, गोरख पडोळे, प्रकाश इवळे, गोरख बोरुडे, रघुनाथ केदार संजय हजारे, अक्षय शिंगणे,भैय्या फुलसौंदर, अविनाश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, राजेंद्र फुलसौंदर, मच्छिंद्र फुलसौंदर, अभिजित खोसे आदींसह वैष्णव मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्तेआणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त इम्पेरियल चौकात आकर्षक फुलांची सजावट, रोषणाई आणि भगवे ध्वज लावून परिसर शिवमय करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. वैष्णव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्साहपूर्ण वातावरणात केले.
यावेळी बोलताना सचिन जगताप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून न्याय, स्वाभिमान आणि धैर्य यांचे आदर्श राज्य उभारले. त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला असून त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. राष्ट्रप्रेम, संघटनशक्ती आणि स्वाभिमान यांचा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. समाजात ऐक्य आणि देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी शिवरायांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी रयतेसाठी उभारलेले स्वराज्य आजही आदर्श मानले जाते. त्यांच्या कार्यातून समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.










