6.90 लाखांचा मुद्देमाल जप्त | दोन गुन्हे उघड | एलसीबीची कारवाई
श्रीरामपूर | नगर सह्याद्री
श्रीरामपूर तालुक्यातील घरफोडी चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 6 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बु. येथील रहिवासी सोपान चंद्रभान थोरात यांच्या घरात 16 मे रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला होता. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव-शनि शिंगणापूर मार्गावर सापळा रचून पोलिसांनी स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय 30) व दर्या परांड्या भोसले (वय 35), दोघेही रा. अंतापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 50 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (किंमत 6.50 लाख रुपये) आणि 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 6.90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींकडून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील आणखी एक घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनिरीक्षक संदीप मुरकुटे व त्यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील घरफोडीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे.
कचरा उचलण्याच्या कारणावरून रामवाडी व केडगाव येथील महिलांमध्ये हाणामारी; तिघींविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल
अहिल्यानगर :शहरातील माळीवाडा भागातील बंगाल चौक येथे कचरा उचलण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांतील महिलांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान पुढे हाणामारीत झाले असून, प्लास्टिक पाईप, दगड आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवाडी (सर्जेपुरा) येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिला, त्यांची मुलगी आणि सून हे माळीवाडा येथील बंगाल चौक परिसरात गेले होते. तेथे कचरा उचलण्याच्या कारणावरून त्यांचा केडगाव येथील रहिवासी असलेल्या महिलांशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की, आरोपी अल्काबाई बाजीराव उल्हारे, वनिता रामदास जगधने आणि कलम उल्हारे (सर्व रा. केडगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक महिलांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
त्यानंतर आरोपींनी चिडून जाऊन रस्त्यावरील दगड, फरशीचे तुकडे आणि प्लास्टिक पाईपच्या साहाय्याने फिर्यादी महिलांना बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेत फिर्यादी व त्यांच्या घरातील महिला जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दवाखान्यातून मिळालेल्या जबाबाच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष बनकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
केडगावमध्ये कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर : शहर परिसरातील समता नगर, केडगाव येथे कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय विवाहितेला लाकडी दांडके आणि वायरच्या तुकड्याने क्रूरपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गृहिणी असून समता नगर भागात राहते. दिनांक ८ जून २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून घरात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पती तुषार दिलीप वायकर याने विवाहितेला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी सासू रेखा दिलीप वायकर हिने विवाहितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत वायरच्या तुकड्याने बेदम मारले. तर दीर किरण दिलीप वायकर याने पीडितेचे हात घट्ट धरून ठेवून पती आणि सासूला मारहाण करण्यासाठी मदत केली.
या भयंकर प्रकारानंतर पीडित विवाहितेने तातडीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता पती तुषार वायकर, सासू रेखा वायकर आणि दीर किरण वायकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी अनिता तारडे करत आहेत.
टेम्पोला गाडी घासल्याच्या कारणावरून वाद; एकास दगडाने मारहाण, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर: भिंगार येथील यशवंतनगर भागात गाडीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश किफावत काळे हे यशवंतनगर येथील पालवे किराणा दुकानासमोरून जात होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पिवळ्या रंगाच्या टेम्पोला सुरेश यांच्या गाडीचा किरकोळ धक्का लागला. याच कारणावरून आरोपी अशोक सकट याने चिडून हातात दगड घेतला आणि सुरेश यांच्या डोक्यात डाव्या बाजूला कानाच्या वर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सुरेश यांच्या कुटुंबातील एका महिला नातेवाईकाला आरोपी योगेश अशोक सकट आणि आरमान यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांना रस्त्यावर जाहीररीत्या शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी सुरेश काळे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून, पोलिसांनी अशोक सकट, योगेश सकट आणि आरमान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार म्हस्के करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.










