श्रीगोंदा । नगर सह्याद्री
आधुनिक यांत्रिकीकरणामुळे शेतीत ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी त्यामुळे बैलांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लहान व मध्य शेतकरी आजही पेरणी, मशागत आणि इतर शेतीकामांसाठी बैलजोडीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील प्रसिद्ध बैल बाजारात शनिवारी शेतकरी व व्यापार्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दौंड-नगर महामार्गालगत भरणारा काष्टीचा बैल बाजार हा जिल्ह्यातील प्रमुख जनावरांच्या बाजारांपैकी एक आहे. येथे दर शनिवारी गावरान, खिलार, गावठी, बडोशी व जर्सी जातीचे बैल, तसेच गाय, म्हैस आणि इतर जनावरांची खरेदी-विक्री केली जाते. यंदा मान्सूनने हजेरी लावल्याने पेरणीच्या तयारीला वेग आला आहे. परिणामी, सोलापूर, बीड, पुणे, धाराशिवसह विविध जिल्ह्यांतील शेतकरी आणि व्यापारी बैल खरेदीसाठी काष्टी बाजारात दाखल झाले होते. बैलांचा रंग, बांधा, शिंगांची रचना, दात आणि उंची यानुसार त्यांच्या किती ठरत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.यांत्रिकीकरणामुळे बैलांचे महत्त्व काहीसे कमी झाले असले, तरी पारंपरिक शेती पद्धती जपणार्या शेतकर्यांसाठी बैलजोडी आजही विश्वासाचा आधार असल्याचे चित्र काष्टी बैल बाजारातून स्पष्ट झाले.
बैलजोडीची एक लाख 21 हजार रुपयांना विक्री
शेतकरी बाळासाहेब चव्हाण आणि बापू पाचपुते यांनी सांगितले की, में महिन्यात बैलजोडी विक्रीसाठी आणली असता अपेक्षित भाव मिळाला नव्हता. मात्र, पावसानंतर मागणीत वाढ झाल्याने यावेळी त्यांच्या बैलजोडीची 1 लाख 21 हजार रुपयांना विक्री झाली. बाजारात काही उत्कृष्ट बैलजोड्यांचे व्यवहार दीड लाख रुपयांपर्यंत झाल्याचेही दिसून आले.










