- जाहिरात -spot_img
breaking news

लग्नास नकार दिल्याने तरुणीचे मोडवले लग्न; पैशावरून राडा, कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशाची सुटका, कुठे काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील कायनेटिक चौक परिसरातील एका २३ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने केवळ तरुणीचा हात धरून तिला धमकावलेच नाही, तर तिच्या नियोजित सासरच्या मंडळींना फोन करून तिचे लग्नही मोडले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गजराज हॉटेलसमोरून घरी जात असताना तुषार अर्जुन हरेल (रा. येलुलकर चाळ, रेल्वे स्टेशन) याने तिला अडवले. आरोपीने यापूर्वी तिला लग्नाची मागणी घातली होती, मात्र  तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने सार्वजनिक ठिकाणी तरुणीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तू दुसर्‍या कोणाशी लग्न केले तर याद राख, अशी धमकीही त्याने भररस्त्यात दिली.

इतयावरच न थांबता, आरोपीने तरुणीच्या होणार्‍या सासरच्या मंडळींना संपर्क साधला. माझे आणि तिचे प्रेमसंबंध आहेत, तुम्ही मुलाचे लग्न तिच्याशी करू नका, असे खोटे सांगून त्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तुषार हरेल याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरदले करत आहेत.

पैशांच्या वादातून तरुण जखमी
अहिल्यानगर: कामाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोयात काचेचा ग्लास मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नांदगाव शिवारातील गणपावडर हॉटेल येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजु रमेश ससाणे याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

फिर्यादी दत्तु गिताराम जाधव (रा. धामोरी) हे त्यांच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये चहा पित असताना आरोपी राजु ससाणे तिथे आला. त्याने जाधव यांच्याकडे कामाच्या पैशांची मागणी केली. त्यावर जाधव यांनी सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, दोन-तीन दिवसात देतो असे सांगितले. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने हातातील काचेचा ग्लास थेट जाधव यांच्या डोयात मारला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना ७ मार्च रोजी घडली होती. सुरुवातीला या घटनेची नोंद राहुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान घटनास्थळ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्याने हा गुन्हा आता वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस हवालदार अडबल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  भिक्षुकाच्या वेशात चोरी करण्याचा प्रयत्न फसला....कुठे घडली घटना

महिलेचा पाठलाग करून अश्लील वर्तन
अहिल्यानगर: शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका २० वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित तरुणी ही आपल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेली असताना ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणार्‍या गोरक्षनाथ तांदळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून पीडितेचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत घाणेरडे व अश्लील हावभाव केले. तसेच त्याने पीडितेच्या कुटुंबाला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. विविध कलमान्वये आरोपी गोरक्षनाथ तांदळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार गंगावणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशाची सुटका
अहिल्यानगर – अहिल्यानगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास परिसरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, कत्तलीच्या उद्देशाने बोलेरो पिकअपमधून दाटीवाटीने नेल्या जाणार्‍या चार गिर गायींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.रामवाडी येथील गोरक्षक रोहन कानिफनाथ जगताप यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शहानुर रेहमान सय्यद (३३, रा. घासगल्ली, अहिल्यानगर) हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. चक ०४ ध ११०१) मधून मुया जनावरांना अत्यंत क्रूरपणे बांधून घेऊन जात होता. आरोपी असिफ शब्बीर शेख (रा. कसाई गल्ली) याच्या सांगण्यावरून या गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास निळ हॉटेलसमोर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये अडीच लाख रुपये किमतीचे वाहन आणि सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीच्या चार गिर गायी असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष लगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ