जामखेड | नगर सह्याद्री
लग्नसमारंभात केवळ माईकवर स्वागत करताना नाव पुकारले नाही, या किरकोळ कारणावरून संतापलेल्या तलाठ्याने सूत्रसंचालन करणाऱ्या युवकावर हल्ला करून माईकने डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 11) जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय 37) हे बिभीषण शिवाजी लेकुरवाळे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात उपस्थित होते. समारंभादरम्यान ते माईकवरून आलेल्या नातेवाईक, पाहुणे व ग्रामस्थांचे स्वागत करत होते.दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास जवळा येथील शिवाजी सखाराम हजारे हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. माईकवर स्वागत करताना आपले नाव पुकारले नसल्याचा राग मनात धरून त्यांनी अशोक पठाडे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या तोंडावर हाताने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पठाडे यांच्या हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून घेत त्यांच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात पठाडे जखमी झाले.
घटनेदरम्यान जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार व प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि जखमी पठाडे यांची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर अशोक रामचंद्र पठाडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे (रा. जवळा, ता. जामखेड) यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










