कार्यशाळेत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
जामखेड | नगर सह्याद्री
शेतीतील वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतांचा वाढता वापर आणि जमिनीचे खालावत चाललेले आरोग्य या पार्श्वभूमीवर जवळा परिसरातील शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. याच अनुषंगाने श्री बळीराजा शेतकरी गटाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतकऱ्यांनी एकत्रितपणे तब्बल 200 लिटर दशपण अर्क तयार करून नैसर्गिक शेतीचा प्रभावी संदेश दिला.
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकरी गटातील सदस्यांनी दशपण अर्क निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दहा प्रकारच्या वनस्पती, लसूण, मिरची, देशी गाईचे शेण व गोमूत्र यांचे स्वयंस्फूतने संकलन केले. त्यानंतर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दशपण अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा हा अर्क पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी त्याबाबत विशेष उत्सुकता दाखविली.
यावेळी उपकृषी अधिकारी आर. के. शिंदे यांनी जीवामृत, दशपण अर्क व इतर जैविक घटकांचे महत्त्व पटवून सांगितले. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.सहाय्यक कृषी अधिकारी हृषीकेश चव्हाण-जाधव आणि सागर बोलभट यांनी दशपण अर्क तयार करण्याची प्रक्रिया, त्यातील घटकांचे प्रमाण, वापराची पद्धत आणि त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारत या तांत्रिक माहितीचा लाभ घेतला.कृषी महाविद्यालय हाळगावच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनीही कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. सहयोगी अधिष्ठाता दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता पाटील, सुरेखा पोफळे, मृणालिनी सरोदे, प्रतीक्षा दळवी आणि गायत्री जाधव यांनी दशपण अर्क निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.गोकुळ वामन, कार्यक्रम अधिकारी पोपट पवार आणि उत्कर्ष अमोलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.












