न्यायासाठी तहसीलसमोर उपोषण सुरूच
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम असून, अद्याप कोणतेही संबंधित अधिकारी किंवा प्रशासनातील प्रतिनिधींनी भेट दिलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाणी न्यायालयाचा आदेश असतानाही संबंधित प्रकरणाची योग्य दखल घेतली जात नसून दिलेल्या प्रकरणाची चौकशीही करण्यात आलेली नाही. यामुळे न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.दौलत किसन पिंपळे, कुसुम दौलत पिंपळे, सोहम दौलत पिंपळे व अजय दौलत पिंपळे हे कुटुंबीय तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. उपोषणाला चार दिवस पूर्ण होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. माध्यमांशी संवाद साधताना उपोषणकर्त्यांनी सांगितले की, आम्ही न्यायाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहोत.
चार दिवस झाले तरी आमच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एकही अधिकारी आलेला नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील.दरम्यान, तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. उपोषणावर तोडगा निघतो की ते आणखी लांबते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












