अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून विमा रक्कम उकळण्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे खोटी तक्रार देणाऱ्या मूळ फिर्यादीसह तीन जणांना अटक करण्यात आली असून, 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुकुंदनगर येथील अर्शद आयुब शेख याने त्याची स्कॉर्पिओ चोरीला गेल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर येथील मैनुद्दीन शकील पठाण (वय 21) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अर्शद शेख आणि सलमान मेहबुब खान (रा. कोठला, अहिल्यानगर) यांच्या मदतीने इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठी स्कॉर्पिओ चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला 5 लाख रुपयांचा छोटा हत्ती टेम्पो आणि 5 लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या तपासात फिर्यादी अर्शद शेख यानेच विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गाडीची चोरी झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फिर्यादीसह त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.










