शिवसेनेचे ठिय्या आंदोलन | तीव्र आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जुन्या मीटरमध्ये कोणतीही अडचण नसताना नागरिकांवर नवीन स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असून, त्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देत स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबविण्याची मागणी करत अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या दिला आहे. दरम्यान, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका घेतली.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू होऊनही महावितरणकडून कोणतीही ठोस पूर्वतयारी करण्यात आलेली दिसत नाही. वीजवाहिन्यांवर वाढलेली झाडे, वारंवार तुटणाऱ्या तारा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती न होणे, अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाढीव वीजबिलांमुळे नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि अचानक वीज खंडित होण्यामुळे घरातील महागडी विद्युत उपकरणे खराब होत आहेत. या नुकसानीची भरपाई महावितरण करणार का, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.दरम्यान, स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ थांबवून वीजपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेना जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आंदोलनामध्ये नगरसेवक दत्तात्रय कावरे, बाळासाहेब बोराटे, सुरेश तिवारी, संभाजी कदम, विक्रम राठोड, प्रशांत गायकवाड, घनश्याम घोलप, सागर थोरात, प्रताप गडाख, संजय छजलानी, रवि लालबोंद्रे, नलिनीताई गायकवाड, नितीन खंडागळे, विनोद शिरसाठ, काका शेळके, विकी लोखंडे, अभिजित आष्टेकर यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.










