सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमाफी आदेशाची प्रतीकात्मक होळी करून आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी,शतशिवाय सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, सन 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करावे, पीक कर्जासह मध्य मुदत व इतर सर्व प्रकारच्या कृषी कर्जांचा समावेश करावा तसेच आजी-माजी सैनिक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली. निवडणुकीपूव शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी व निकष लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी फसवी योजना आहे, असा आरोप त्यांनी केला.शासनाने कर्जमाफीची आशा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. तालुक्यातील सर्वपक्षीय व सामाजिक घटकांना एकत्र घेऊन कर्जमाफीचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी राजेंद्र म्हस्के यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शेवटपर्यंत पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. संघर्ष क्रांती संघटनेचे प्रशांत दरेकर यांनी शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या आंदोलनात राजेंद्र म्हस्के, अनिल घनवट, मारुती भापकर, प्रशांत दरेकर, एकनाथ आळेकर, अरविंद कापसे, हेमंत नलगे, भाऊसाहेब नेटके, भास्कर वागस्कर, मुकुंद सोनटक्के, अनिल ठवाळ, राजेंद्र नागवडे, डॉ. कोकाटे, गंगाराम दरेकर, रूपेश इथापे, रामभाऊ गुणवरे, रघुनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर खेतमाळीस, महादेव म्हस्के यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.










