मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात काही भागात पुढील काही दिवस अंशतः आभाळी हवामान राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले. कोकणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
गुरूवारी अकोल्यासह अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. नागपूर, परभणी, सोलापूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.










