अहिल्यानगर | नगर सह्याद्री
हनुमान नगर परिसरातील कचरा, झाडांच्या फांद्या आणि हिरवा कचरा हटविण्यासाठी सोमवारी आलेल्या महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकाला काही स्थानिकांकडून विरोध झाल्याने स्वच्छता मोहीम सुमारे एक तास खोळंबल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांशी वाद घालत जेसीबी व डंपरच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
हनुमान नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यालगत पडून असलेल्या झाडांच्या फांद्या, हिरवा कचरा आणि अस्वच्छतेबाबत महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीनंतरही सुमारे दोन महिने कचरा जागेवरच पडून होता. अखेर महानगरपालिकेने सोमवारी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने परिसरातील कचरा हटविण्याचे काम सुरू केले.
मात्र, प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम सुरू असतानाच काही नागरिकांनी वाहनांसमोर उभे राहत कामाला विरोध केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली. तसेच जेसीबी व डंपरच्या हालचाली रोखण्यात आल्याने स्वच्छतेचे काम सुमारे एक तास ठप्प राहिल्याचे प्रत्यक्षदशनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या कचऱ्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या, त्याच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्यानंतर विरोधाची भूमिका घेतली गेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कामात अडथळा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, संपूर्ण घटनेचे चित्रीकरण झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान झालेल्या वादामुळे सार्वजनिक कामकाजावर परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त करण्यात आल्या.
वादातही कर्तव्याला प्राधान्य
कचरा हटविताना निर्माण झालेल्या वादामुळे काही काळ काम ठप्प झाले असले, तरी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संयम राखत आपले कर्तव्य पार पाडले. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने परिसर स्वच्छ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक नागरिकांनी स्वागत केले.
स्वच्छतेची मागणीही, विरोधही!
हनुमान नगर परिसरातील कचरा आणि झाडांच्या फांद्यांबाबत नागरिकांनी दोन महिन्यांपूव तक्रार केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर महानगरपालिकेने जेसीबी, डंपर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा हटविण्याचे काम सुरू केले. मात्र, त्याच कामादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे मोहीम काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे स्वच्छतेची मागणी आणि स्वच्छतेलाच विरोध? असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला.










