सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावाजवळील चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दि. 16 जुलै रोजी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर सुपा पोलीस ठाण्यात तरूण व विद्यार्थ्यांसह सुमारे 50 ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके व नारायणगव्हाण ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर-पुणे महामार्गावरील अपूर्ण व धोकादायक रस्त्यामुळे गेल्या काही दिवसांत वारंवार अपघात होत असून अनेक युवक गंभीर जखमी झाले आहेत. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी , महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. भरधाव वाहने रस्त्यालगतच्या घरांमध्ये घुसल्याने मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या प्रश्नाबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित विभागांसह पीडब्लूडी अधिकारी व काम न करता टोल वसुली करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेस कंत्राटदारांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत तसेच सुपा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेऊन आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके तसेच नारायणगव्हाण ग्रामस्थ उपस्थित होते.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
नारायणगव्हाण येथील रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ज्या कंपनीकडे हे काम आहे त्यांच्याकडून टोल वसुली सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम तातडीने माग लावावे, यासाठी ग्रामस्थांनी पारनेर तहसीलवर लोटांगण, भर उन्हाळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात समोर लोटांगण आंदोलन केले. यासह अनेक वेळा उपोषण, रस्ता रोको आंदोलन केले, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली परंतु दि. 16 जुलै रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांसह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.










