शिराळमध्ये दीड एकरातील डाळिंबे चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा
पाथर्डी | नगर सह्याद्री
एकीकडे बिबट्याची प्रचंड दहशत आणि दुसरीकडे शेतमालावर डल्ला मारणारे चोरटे अशा दुहेरी संकटात पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील शेतकरी सापडले आहेत.
शिराळ येथील गट क्रमांक 464 मधील शेतकरी वर्षा शरद मुळे व शरद मुळे यांच्या डाळिंब बागेतून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. 25) रात्रीच्या सुमारास सुमारे दोन ते अडीच लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुळे दाम्पत्याने आपल्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची सुमारे 500 झाडे लावली आहेत. रात्रीचा दिवस करून, कठोर परिश्रम घेत त्यांनी मृगबहराची डाळिंब बाग फुलवली होती. सध्या बाजारात डाळिंबाला 150 ते 200 रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळत आहे. बागेतील झाडे फळांनी बहरली होती. मात्र, शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत बागेवर धाड टाकली आणि तब्बल 150 कॅरेट (सुमारे 2 टन) डाळिंबे तोडून नेली. यात मुळे यांचे 2 ते अडीच लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बिबट्याच्या दहशतीचा चोरट्यांनी घेतला फायदा
सध्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने थांबणे किंवा राखण करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या भीतीपोटी अनेक शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. बिबट्याच्या या दहशतीचाच थेट फायदा चोरट्यांनी उठवल्याचे समोर आले आहे. चोरीची ही घटना समोर येताच पाथड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर व पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.










