राळेगणसिद्धी येथील शिक्षक, माजी सैनिक मित्रांचा प्रेरणादायी संदेश
पारनेर | नगर सह्याद्री
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राळेगणसिद्धी येथील सुनिल विठ्ठल मापारी व भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेले ज्ञानेश्वर (माऊली) मापारी यांनी राळेगणसिद्धी ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते राळेगणसिद्धी असा तब्बल 440 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या 48 तासांत पूर्ण करून प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
कोणतेही पूर्वनियोजन नसताना अचानक ठरलेल्या या प्रवासाला दोघांनी रात्री सुरुवात केली. प्रवासादरम्यान अंधार, खराब रस्ते, वारंवार होणारे पंक्चर, प्रचंड उष्णतेचा तडाखा आणि समोरून वाहणारे वारे अशा अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी पंढरपूर गाठले. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. जिद्द, परस्पर सहकार्य आणि मानसिक ताकदीच्या जोरावर त्यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा प्रवास कोणत्याही विक्रमासाठी नसून स्वतःतील सुप्त शक्तींचा शोध घेण्यासाठी होता. या प्रवासातून प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता दडलेली असून ती जागवण्यासाठी स्वतःला आव्हान देणे आवश्यक असल्याचा संदेश दोघांनी दिला.
सैनिकी जीवनात शिकलो तो धडा या प्रवासात पुन्हा अनुभवला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार माणसाला यशापर्यंत पोहोचवतात.
– ज्ञानेश्वर मापारी, माजी सैनिक
या प्रवासाने मला शिकवले की मर्यादा शरीरात नसतात, त्या मनात असतात. एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी असेल तर अशक्य वाटणारे ध्येयही गाठता येते.
– सुनील मापारी, प्राथमिक शिक्षक










