राहुरी | नगर सह्याद्री
तांदुळवाडी येथील नवयुग कॉलनी नवीन गावठाण परिसरात हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य निसारभाई सय्यद, सदस्या शितल आढाव तसेच नवयुग कॉलनी गावठाण येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
तांदुळवाडी हद्दीतील नवयुग कॉलनी गावठाण या प्रभागात सुमारे 1600 ते 1700 नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, या परिसरात स्वतंत्र हिंदू स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी जावे लागते. तसेच तांदुळवाडी गावात सुमारे 75 मुस्लिम कुटुंबे वास्तव्यास असून दफनभूमीची व्यवस्था नसल्याने त्यांनाही दफनविधीसाठी 7 ते 8 किलोमीटर दूर जावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही समाजांच्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी ग्रामस्थांसह 23 जूनपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ सदस्य निसारभाई सय्यद यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खडके, माजी सैनिक भैय्यासाहेब आढाव, पत्रकार विनीत धसाळ, सचिन शेटे, शंकर लष्करे, आमिन पठाण, प्रवीण जाधव, अविनाश पेरणे, प्रमोद खडके, नितीन मकासरे, काशिम शेख, ज्ञानदेव पुंड, विशाल ठोंबे, लखन गायकवाड, बाबासाहेब जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते










