संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. भारतीय संविधानातील कलम 19(1)(अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हा गुन्हा नसून तो संविधानाने दिलेला अधिकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रविराज साबळे यांनी शेतकरी, कामगारांचे थकीत प्रश्न, कारखानदारांकडून होणारा अन्याय तसेच विविध सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अभिव्यक्ती स्वातंत््रय दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील मतप्रदर्शन, सरकार किंवा प्रभावशाली व्यक्तींवर टीका करणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे लोकशाहीतील नागरिकांचे संविधानिक अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयांत स्पष्ट केले असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
कोणताही अधिकारी, संस्था किंवा कारखानदार संविधानापेक्षा मोठा नाही. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना सत्य मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे, असे अरविंद कापसे यांनी निवेदनात नमूद केले.
श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 110 कोटी रुपये तसेच महाराष्ट्रातील तब्बल 2000 कोटी रुपयांचे उसाचे बिल थकीत ठेवणारे बाबू बोत्रे हे देश सोडून जाण्याची शक्यता असल्याने त्यांचा पासपोर्ट तात्काळ जप्त करण्यात यावा, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
अब्रूनुकसानीच्या दाव्यांचा गैरवापर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. रविराज साबळे यांच्यावरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा 21 तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.










