द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
काँग्रेसनं तामिळनाडूत द्रमुकची साथ सोडताच घेतला निर्णय
नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या द्रमुकनं मोठा निर्णय घेत लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार दिला आहे. द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. द्रमुकच्या या निर्णयानं इंडिया आघाडीला धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पराभवाचा सामना करावा लागला, यानंतर काँग्रेसनं थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं द्रमुक नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय.
कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की द्रमुक खासदारांच्या लोकसभेतील बैठक व्यवस्थेत बदल करण्यात यावेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतची आघाडी संपली आहे. त्यामुळं लोकसभेत सध्याची बैठक व्यवस्था आहे, त्यानुसार काँग्रेस सोबत बसणं योग्य होणार नाही. द्रमुकच्या लोकसभेतील खासदारांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात यावी, असं कनिमोळी यांनी म्हटलं आहे.
तामिळनाडूत द्रमुकचा पराभव
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा मोठा पराभव झाला. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आणि द्रमुकनं आघाडी करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एम.के स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. 234 जागांपैकी द्रमुकला 59 जागांवर विजय मिळाला. तर, थलपती विजय यांच्या TVK पक्षाला 108 जागांवर विजय मिळाला. अण्णाद्रमुक पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला. यामुळं तामिळनाडूच्या विधानसभेचा निकाल त्रिशंकू बनला आहे. काँग्रेसनं 5, पीएमके 4, माकप 2, भाकप 2, इंडियन युनियन मुस्लीम लीगनं 2, भाजपनं 1 आणि डीएमडीके आणि अम्मा मुक्कल मुनेत्र कळघम पक्षानं एका जागेवर विजय मिळवला आहे.










