नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, गतिरोधक बसविण्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर ते जामगाव या प्रमुख जोड रस्त्यावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून, वाढत्या वेगामुळे हा रस्ता आता अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनू लागला आहे. या रस्त्यालगत असलेल्या राहुलनगर वस्ती परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला असून, या ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे. पारनेर-जामगाव रस्ता हा परिसरातील प्रमुख गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी गाड्यांसह मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक चालते. महामार्गासारखी स्थिती झालेल्या या रस्त्यावर वाहनचालक कमालीच्या वेगाने वाहने चालवतात. रात्रीच्या वेळी तर हा वेग अधिकच जीवघेणा ठरतो.
या रस्त्याला लागूनच राहुलनगर ही मोठी निवासी वस्ती आहे. वस्तीमधील लहान मुले, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुले, मुली आणि वृद्ध नागरिक यांना रोजच्या कामासाठी, शाळेत जाण्यासाठी किंवा बस पकडण्यासाठी हा रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, समोरून येणाऱ्या वाहनांचा वेग इतका प्रचंड असतो की, रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अनेकदा वाहनचालक वस्तीचा परिसर असूनही वाहनांचा वेग कमी करत नाहीत. यामुळे येथे किरकोळ अपघात रोजचेच झाले असून, एखादा मोठा भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गतिरोधक न बसविल्यास आंदोलन करणार
आमची लहान मुले खेळताना किंवा शाळेत जाताना रस्त्यावर आली की आमचा जीव वर-खाली होतो. वृद्ध माणसांना तर रस्ता ओलांडणे अशक्य झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संवेदनशील भागात त्वरित पांढरे पट्टे मारून दर्जेदार गतिरोधक बसवावेत, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राहुलनगरमधील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.










