लोणी / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रूपयांची कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून राज्यातील शेतकऱ्यांना बळ दिले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील सर्व अटी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महायुती सरकारच्या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त करतानाच, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून, सलग तिसऱ्यांदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय करणारे हे राज्य सरकार एकमेव आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देताना सर्व अटी काढून टाकल्या आहेत. त्यामुळे प्रोत्साहनपर योजनेत २०२६-२७ या आर्थिक वर्षात कर्जफेड केलेली असावी, ही अट काढून टाकण्यात आली असल्याचे सांगून, मागील दोन वर्षांत कर्जफेड केली असेल तरीही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा असून, ही अट शिथिल झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. यापूर्वी सरकारने वीजबिल माफीचा निर्णय केला आहे. या योजनेमुळे दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. विविध योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून महायुती सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत ९५ हजार कोटी रुपयांची मदत केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९२ हजार ५१४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल. प्रशासकीय स्तरावर याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
राज्यात वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक संकटात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. केवळ घोषणा नाहीत, तर निर्णयाची थेट अंमलबजावणी करणारे महायुती सरकार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. कर्जमाफी योजनेच्या निर्णयाने कृषी क्षेत्राला बळ आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाला न्याय मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.










