अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चास (ता. अहिल्यानगर) शिवारात घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात पडल्याने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 27 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अमितेश बलराज बिडे (वय 10) व अनिकेत बलराज बिडे (वय 06, दोघे रा. चास, ता. अहिल्यानगर)) असे मयत बालकांची नावे आहेत. ते दोघे सख्खे भाऊ आहेत.
याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या अमितेश व अनिकेत हे दोघे सख्खे भाऊ त्यांच्या घराजवळ पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या डबक्यात पडले. त्याच्या नातेवाईकांना ही घटना कळताच त्यांनी त्या दोघांना बाहेर काढले.
ते बेशुध्द झाल्याने त्यांचे चुलते जयसिंग बिडे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मयत घोषित केले. तशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे चास शिवारात शोककळा पसरली. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.