मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता अभियान
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
काही महिन्यापूर्वी शहरातील कचर्याचा प्रश्न गंभीर होता. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ८० घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून कचरा संकलनाचे काम सुरू आहे.
काही नागरिकांमध्ये कचर्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे तर काही नागरिक अजूनही कचरा रस्त्यावर टाकत आहे. इंदोर शहराच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून काम सुरू असून या पुढील काळात नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल. अहिल्यादेवी होळकर यांचा इंदोर व अहिल्यानगर शहराला वारसा लाभला आहे. तो पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. यासाठी सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी, महिला मंडळ यांनी पुढे येऊन आपले घर, आपला परिसर, आपले शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड, श्रीराम चौक, एकविरा चौक, संघर्ष चौक, नामदे चौक, छत्रपती संभाजी महामार्गापर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, उपयुक्त संतोष टेंगळे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, सुनील त्रिंबके, संपत नलवडे, योगेश ठुबे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे आदीसह स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयुक्त यशवंत डांगे म्हणले की, संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते. आजही आपण सर्वजण स्वच्छतेवरच काम करत आहोत प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यास आपले शहर, स्वच्छ सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. महापालिकेने दैनंदिन स्वच्छतेबरोबर शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे तरी नागरिकांनी आपापल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि घंटागाडीतच कचरा टाकावा असे ते म्हणाले.



