Maharashtra Crime News: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गरसुळी गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने शेतातील घरात राहणाऱ्या वयोवृद्ध नवरा-बायकोची निर्घृण हत्या करून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी उघडकीस आली असून अवघ्या 12 तासांत लातूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा गावातीलच असल्याचे समोर आले आहे.
पुष्पलता रावसाहेब कातळे (वय 52) यांना आरोपीने प्रथम डोक्यात कुकर फेकून मारले, त्यानंतर दगडाने ठेचून हत्या केली. त्यांच्या पतीला–रावसाहेब मुकुंद कातळे (वय 60) – अर्धांगवायूचा झटका आलेला असल्याने ते हालचाल करू शकत नव्हते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांना घराजवळील विहिरीत फेकून दिले. या क्रूर कृत्यात दोघांचा मृत्यू झाला.
चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व कानातले लंपास केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि स्थानिक गुन्हे शाखेने केवळ 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळे याला अटक केली. तपासात हे स्पष्ट झाले की त्याने केवळ चोरीच्या उद्देशाने हे क्रौर्य केले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.