पालकमंत्री विखे पाटील, टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
शेवगाव | नगर सह्याद्री
ताजनापूर टप्पा क्र. 1 योजनेस 250 कोटी रुपयांचा निधी तसेच बंधारे व तलाव दुरुस्तीस साडेसहा कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
पाथर्डी -शेवगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहीम तसेच टंचाई आढावा बैठक अमरापूर येथे गुरुवारी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आ.मोनिका राजळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विनायक देशमुख, पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, प्रांताधिकारी प्रसाद मते, जि.प. सदस्य राहूल राजळे, युवराज नरवडे, महेश फलके, मृत्युजंय गर्जे, मंगल कोकाटे यांच्यासह तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पाणी टंचाईवर प्रभावी उपाययोजनेसाठी, ताजनापूर टप्पा क्रमांक 1 योजनेस 250 कोटी रुपयांचा तसेच बंधारे व तलावांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांमध्ये टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक व नियोजनबद्ध करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग असल्याने राज्यातील नदीजोड प्रकल्पामध्ये या भागासाठी स्वतंत्र पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी केली. मागील वषच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या साठवण बंधारे व तलावांच्या दुरुस्तीसाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी, ताजनापूर उपसा सिंचन योजना क्रमांक 1 व 2 साठी निधी, मुळा पाटबंधारे योजनेचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यक त्या गावांमध्ये तातडीने टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण पालवे यांनी, सूत्रसंचालन सुरेश बाबर व राजेंद्र सुरवसे तर आभार मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे यांनी मानले.
मतदार सखोल पुनरिक्षण मोहिमेचा फायदा
मंत्री विखे पाटील यांनी 22 राज्यात ही मोहीम सुरू असल्याचे नमूद करून या मोहीमेमुळे कोणत्याही मतदारावर अन्याय होणार नाही. दुबार मतदार आणि मतदार यादीत खोटी माहिती देऊन नाव टाकलेल्या व्यक्तीची नाव कमी करण्याची ही संधी असल्याचे सांगितले. मतदार सखोल पुनरिक्षण मोहीमेचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसेल. कारण ही मोहीम परत कधी होईल माहीत नाही. त्यामुळे आताच गांभीर्यपूर्वक मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी यावेळी केले.












